मालेगाव, 19 ऑगस्ट: मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील दहिवाळ शिवारात नाशिकहून पाचोऱ्याकडे येणाऱ्या बुधवारी एसटी बसची आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसमधील दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २३ प्रवासी जखमी झाले आहेत. धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा एसटी बस ४० हून अधिक प्रवाशांना घेऊन मालेगावहून चाळीसगावच्या दिशेने जात होती. दहिवाळ शिवारात पोहोचली असता चाळीसगावकडून येणाऱ्या ट्रकची बसला समोरून जोरदार धडक बसली. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
अपघातात दोघांचा मृत्यू –
या अपघातात इरशाद बी रमजान मणियार (६०, रा. जामनेर) आणि सखुबाई किरण माळी (६५, रा. एरंडोल) या दोन महिलांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तातडीने मालेगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
जखमींमध्ये प्रणिता विनोद ततार (४७), राजेंद्र जगन्नाथ ततार (६३), आशा राजेंद्र ततार (५७) यांच्यासह ऋतुजा शुभम सोनजे (२४), अरमान नजीम पिंजारी (३५), गोकुळ रामदास भामरे (६५), सुनंदा गोकुळ भामरे (६०), सुहाना अझीसा (१९), निधा अझीसा (६६) आणि रत्नाबाई नाना अहिरे (६०) यांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातामुळे मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.






