महेश पाटील, प्रतिनिधी
भडगाव, 24 मे : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळील प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या अपघातात एसडीआरएफ पथकातील तिघा जवानांचा मृत्यू झाला होता. यामध्ये भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वीर जवान वैभव सुनील वाघ यांचा देखील समावेश होता. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर पांढरद येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार –
प्रवरा नदीतील दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या मुख्यालयात आणत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पांढरद येथील वीर जवान वैभव वाघ यांचे पार्थिव सकाळी गावात दाखल झाले. यावेळी त्यांना श्रध्दांजली वाहत मानवंदना देण्यात आली. यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आमदार किशोर पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी शहीद जवान वैभव वाघ यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.एम. रेड्डी यांनी देखील शहीद जवानास श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, वीर जवान वैभव वाघ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवरा नदीतील दुर्घटनेत तीन जवान शहीद –
अहमदनगरमधील प्रवरा नदीत दोन जण बुडाले होते. यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याला शोधण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, एसडीआरएफची बोट शोधकार्य सुरु असताना अचानक उलटली. या बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक नागरिक बुडाला. या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये भडगाव तालुक्यातील पांढरद येथील वीर जवान वैभव वाघ यांचा समावेश होता.
हेही वाचा : डोंबिवली एमआयडीसी आग प्रकरण, शोधकार्यात आणखी तीन मृतदेह सापडले; मृतांचा आकडा 11 वर