जळगाव, 23 जून: नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) अरबी समुद्रावरील सुमारे 15 दिवसांपासून रखडलेली वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. सोमवारी (ता. २२) मॉन्सूनने कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील पुणे तसेच मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूरपर्यंत प्रगती केली. हवामान अनुकूल असल्याने मान्सून पुढील २४ तासांत मुंबईसह राज्यातील आणखी काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाच्या सरींना वेग येणार –
यंदा मॉन्सून नेहमीच्या तारखेपेक्षा तीन दिवस उशिराने, ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर वाऱ्यांचा वेग वाढल्याने ६ जून रोजी त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला. ८ जूनपर्यंत मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रावरील वातावरणीय परिस्थितीमुळे त्याची प्रगती जवळपास दोन आठवडे थांबली होती.
दरम्यान, सोमवारी (ता. २२) मॉन्सूनने पुन्हा गती घेत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लक्षणीय प्रगती केली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाच्या सरींना वेग येण्याची शक्यता असून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा केली जात असताना काल जळगाव शहरासह भडगाव, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांसह जामनेर आणि अमळनेर तालुक्यात सोमवारी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात अंशतः अंशतः ढगाळ वातारवण राहणार असून मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.






