पालघर, 30 ऑगस्ट : सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्याबाहेरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव तसेच राजा-महाराजा, राजपुरूष नसून आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत. आणि म्हणून मी आज नम्रतेने माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? –
आज या कार्यक्रमाची चर्चा करत असताना, मी आपल्या भावना व्यक्त करू इच्छितो. भारतीय जनता पक्षाने 2013 मध्ये माझी पंतप्रधान पदासाठी माझी उमेदवारी निश्चित केली होती, तेव्हा मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ बसत पार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताजवळ ज्यापद्धतीने प्रार्थना करतो. त्याचपद्धतीने भक्तीभावाने आशिर्वाद प्राप्त करून मी राष्ट्रसेवेच्या एका नव्या यात्रेचा आरंभ केला होता.
मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो –
काही दिवसांपुर्वी सिंदुधूर्गमध्ये जे काही झाले. माझ्यासाठी व माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव तसेच राजा-महाराजा, राजपुरूष नसून आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत. आणि म्हणून मी आज नम्रतेने माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही ते लोकं नाही आहोत. जे आजकाल भारत माता के महान सुपूत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करतात. देशभक्तीच्या भावानांसोबत खेळतात. असे असतानाही वीर सावरकर यांना शिवीगाळ करूनही माफी मागायला जे तयार नाहीयेत. न्यायालयात जाऊन लढाई लढायला ते तयार असतात. मात्र, एवढ्या मोठ्या सुपूत्राचा अपमान करूनही त्यांना पश्चाताप होत नाही. महाराष्ट्राची जनता त्यांच्या संस्कारांना आता ओळखून घ्या.
मी महाराष्ट्रात येतात आज माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायांवर माथा टेकवत माफी मागितली. तसेच जे जे लोकं छत्रपती शिवाजी महाराज यांना आपलं आराध्य दैवत मानतात, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांचीही मी माफी मागतो. हे आमचे संस्कार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. पालघरच्या सिडको मैदानात हा भूमिपूजन सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तब्बल 76,200 कोटी रूपयांच्या या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 12 लाख रोजगार निर्माण होणार आहेत.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी, लातूरात जनसन्मान यात्रेत नेमकं काय घडलं?