जळगाव, 8 सप्टेंबर : राज्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झालंय. असे असताना पाऊस देखील पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करत पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आजपासून पाऊस सक्रिय –
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने पावसाचा जोर वाढला आहे राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. असे असताना आज, रविवारपासून पुढील तीन दिवसांपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, किनारपट्टीलगतच्या परिसरात व घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढणार असून तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अलर्ट –
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस बरसणार आहे. तसचे याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, परभणी, धाराशीव, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह कोकण, घाट माथ्याबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा आज इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज –
खान्देशातील नंदुरबार, धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला असल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यात असलेल्या धरणातील जलसाठ्यांतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील विविध भागात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् डोक्यात दगड घालून केला खून, चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना