भुसावळ, 1 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भुसावळातून धक्कादायक घटना समोर आली. उधार दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने भुसावळमध्ये 31 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मामीनेच आपल्या नातेवाईकांकडून तरुणावर हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील हत्या झालेल्या तरुणाने मामे बहिणीच्या विवाहासाठी मामीला उधार पैसे दिले होते. उधारीवर दिलेले पैशांची तरुणाने मामीकडे मागणी केली होती. दरम्यान, याचा राग आल्याच्या कारणावरून मामीने आपल्या नातेवाईकांकडून तरुणावर हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नातेवाईकांच्या मदतीने रचला हत्येचा कट –
नजीर शेख असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. उधारीवर पैसे परत मागितल्याचा राग आल्याने मृत तरुणाच्या मामीनं आपला भाऊ आणि भाच्याच्या मदतीने तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नजीर शेख याचा मृत्यू झाला आहे.