मुंबई : मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले असून पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर दिसून आला असून मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केलीय. दरम्यान, ही नोंद गेल्या 68 वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख 11 जूनअसून, यंदा तब्बल 16 दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. तर दुसरीकडे पहिल्याच पावसात मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून येत आहे.
आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल –
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील अॅक्वा लाईन भुयारी मेट्रो स्टेशनला भेट देत मुंबई मेट्रोच्या कामाची पोलखोल केली. प्रशासन सांगतंय की मेट्रो स्टेशनचं काम सुरू आहे, जर काम सुरू आहे तर कोणत्या स्टेशनचं उद्घाटन केलं आणि का? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
दरम्यान, दादरच्या हिंदमाता परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून आदित्य ठाकरे यांनी येथील पाणी साचल्याचा व्हिडिओ देखील ट्विटरवरुन शेअर करत निशाणा साधलाय. आम्ही 4 वर्षापूर्वीच हा परिसर वॉटर लॉगिंग फ्री केला होता. मात्र, भाजपने मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळवल्यानेच हे पाहायला मिळत असून महापालिकेने कुठलीही पावसाळ्यापूर्व तयारी केली नाही. भाजपच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेनं एकाच पावसात शहर बुडवून दाखवले असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय.
एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर –
आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत सांगितले की, ही पोलखोल कशी काय? पाऊस जर 15 दिवस आधी पडला तर काय होणार. मी कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट पाहिले आणि आता पाणी राहिलेले नाही. 10 जूननंतर पाऊस येतो, तशी तयारी आपण करत असतो. नरिमन पॉइंटला 252 मिमी पाऊस पडला असून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. मुख्यमंत्री संपर्क ठेऊन आहेत, यंत्रणा अलर्ट आहे, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
मंत्री गिरीश महाजनांचे नियंत्रण कक्षावर लक्ष –
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज सकाळीच मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात थेट उपस्थित राहून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली. सध्या मी स्वतः मंत्रालयात उपस्थित असून राज्य नियंत्रण कक्षातून सतत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी सातत्याने समन्वय साधत आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, हीच विनंती, असे यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले.