जळगाव, 17 सप्टेंबर : जळगावातील शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालावर पीकविमा, शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आक्रोश मोर्चाचा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केलं. या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात आंदोलन केले.
दरम्यान, हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांसह निघालेला आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोहोचला. यावेळी शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी स्वतः स्वीकारण्यासाठी न आल्याने बच्चू कडू यांच्यासह आंदोलक आक्रमक झाले. यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत आयुष प्रसाद यांच्या दालनात धडक दिली. यावेळी काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं.
View this post on Instagram
बच्चू कडूंचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट सवाल –
बच्चू कडू यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात प्रवेश करून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी स्वतः बाहेर का येऊ शकत नाहीत? असा थेट सवाल बच्चू कडूंनी आयुष प्रसाद यांना उपस्थित केला.