पुणे : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतले. यानंतर ते भारतात परतले. याठिकाणी त्यांनी आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली.
जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केले होते. फ्रेड हॉईल हे जयंत नारळीकर यांचे गुरू होते. जगभरातील आघाडीच्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये फ्रेड हॉईल यांचा समावेश व्हायचा. त्याकाळात हॉईन-नारळीकर ही थिअरी प्रसिद्ध झाली होती. जगाची निर्मिती स्फोटातून झाली, या थिअरीचे दोघेही टीकाकार होते. जयंत नारळीकर यांना 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बोलावून घेतले. त्यानंतर जयंत नारळीकर यांनी टीआयएफआरमध्ये दाखल झाले.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित –
डॉ. जयंत नारळीकर यांना 2004 मध्ये पद्मविभूषण, 2010 मध्ये महाराष्ट्र भूषण आणि 2014 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
2021 मध्ये नाशिक मध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. आंतररष्ट्रीय स्तरावर त्यांचा खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता. इतकेच नव्हे तर तितक्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहिण्यासाठी देखील जयंत नारळीकर लोकप्रिय होते.
हेही वाचा : chhagan bhujbal : ‘अखेर भुजबळ इज बॅक!’, ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ