मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. या 5 रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये महायुती सरकारमधील भाजपच्या वाट्याला 5 पैकी 3 जागा येणार आहेत. या तीन जागांवर नेमकी कुणाला संधी मिळणार, अशी चर्चा होती. दरम्यान, याबाबतची उत्सुकता आता संपली असून भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
भाजपकडून 3 उमेदवारांची नावे जाहीर –
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या वतीने आपल्या 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर, दादाराव यादवराव केचे यांना संधी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या तिघांच्या नावाला संमती दिली आहे. तसेच या तिन्ही नेत्यांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
5 जागांचे महायुतीतील वाटप –
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण रिक्त झालेल्या 5 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदेसेनेकडून खान्देशातील नेत्याचे नाव आघाडीवर –
दरम्यान, नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव शिवसेनेकडून आघाडीवर असल्याचे कळते आहे. तर यासोबतच शिवसेनेकडून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नेमकी कुणाला संधी मिळणार हे लवकरच कळणार आहे.
हेही वाचा – ज्येष्ठ नेते शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पंतप्रधानांच्या भाषणाचं कौतुक करत एक विनंतीही केली
हेही वाचा – घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?