मुंबई, 8 ऑगस्ट : दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राखी बांधली व ओवाळले. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर, भालिवली, जिल्हा पालघर येथून आलेल्या आदिवासी महिलांनाही राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली राखी बांधली.
राजभवनात रक्षाबंधन –
रक्षाबंधनानिमित्त विविध संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थिनी, भगिनी व बांधवांनी गुरुवारी 7 ऑगस्ट राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली व ओवाळले. यावेळी राज्यपालांनी सर्वांच्या राखीचा विनम्रपणे स्वीकार करीत सर्वांची विचारपूस केली व भेटवस्तू दिल्या.
राज्यपालांची भेट घेतलेल्या संस्थांमध्ये सिंधुताई सपकाळ यांनी सुरु केलेले ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनी, मुंबई मनपा अंतर्गत विविध महिला बचत गटांच्या सदस्य, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर,जिल्हा ठाणे येथील विद्यार्थिनी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण (जिल्हा रायगड) येथील विद्यार्थींनी, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)च्या येथील दृष्टिहीन विद्यार्थिनी, प्रतीक्षा महिला बचत गटातील महिला यांचा समावेश होता.
भारत विकास परिषद, माटुंगा तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी व बांधवांनी देखील राज्यपालांना राखी बांधली.