नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची गेल्या अनेक वर्षांपुर्वीपासूनची मागणी केली जात होती. दरम्यान, आज केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची ही मागणी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनीही ही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे. या महत्त्वाच्या निर्णयासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार व महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानत सांगितले की, आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.
हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महिला सुरक्षेवर परखड मत, जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष मुलाखत