संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 30 मे : शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे महसूल विभागातील विविध कार्यालयात प्रलंबित असलेली प्रश्न निकाली काढण्यासाठी महसूल विभागाच्यावतीने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे पारोळा येथील तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसिलदार डॉ.उल्हास देवरे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, गटविकासअधिकारी संजय मोरे, तालुका कृषि अधिकारी दिपक आहेर, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील, मा.नगरसेवक राजु कासार, कैलास पाटील, योगेश पाटील यांचेसह सर्वच शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते.
महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्हा वार्षिक योजनेमधून ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ अंतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येत असून त्याचे नामकरण ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ असे करण्यात आले आहे.
या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर वर्षातून किमान चार वेळा ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात येणार,आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड यांचे वाटप, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजना इत्यादींचा लाभ देण्यात येत आहे.
तसेच या अभियानांतर्गत सात-बारा वाटप, प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे व विविध शासकीय योजनासाठी लागणारे दाखले अशा महसूल विभागाच्या विविध योजना आदींबाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज या शिबिरात करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्याच्या सूचना सर्व महसुली अधिकारी व कर्मचारी यांना यावेळी दिल्या.