महाड (रायगड) : मुक्ताईनगर येथील कोथळी येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना, त्याठिकाणी माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते रायगड जिल्ह्यातील महाड येथे माध्यमांशी बोलत होते.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चारही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने त्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचे काम केलेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. काहींना अटक केलेली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. पण अशाप्रकारे छेडखानी करणं, सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्यांना त्रास देणं, हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना, त्याठिकाणी माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल.
नेमकं काय घडलं –
मंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर येथे माध्यमांशी बोलताना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी म्हटले की, दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी घटना घडली, तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नव्हे तर आई म्हणून आली आहे.
दरवर्षी मुक्ताईनगरला कोथळीला मुक्ताबाईची यात्रा असते. या यात्रेत साहजिक मुलीही जात असतात. परवा संध्याकाळी मला माझ्या मुलीचा फोन आला आणि यात्रेत जाण्याबाबत विचारले असता मी तिला सांगितले की, घरचा गार्ड त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन-तीन मुले मी तिच्यासोबत पाठवले.
तिथे तिच्यासोबत जी वागणूक झाली, तिच्यासोबत 17-18 वर्षांच्या आतल्या मुली होत्या. त्रिशिकापण आता दोन दिवसांपूर्वी 18 वर्षांची झाली. या सर्व 17-18 वर्षांच्या मुली होत्या. पण तिथे कुणीतरी भोई नावाच्या मुलाने, तिथे पाळण्यात बसायला गेला, यांच्यामागे मागे फिरू लागले. आमच्या गार्डने त्याचा मोबाईल घेतला असता त्याने सर्व शुट केलं. बळजबरीने बाजूच्या पाळण्यात जाऊ बसले. आमच्या लोकांना उतरवून जाऊन बसले. परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं. दुसऱ्या पाळण्यातही त्यांनी तसंच केलं. बसल्यानंतर त्याने सर्वांचे व्हिडिओ काढले.
नंतर माझ्या गार्डला शंका आली. या तरुणाने मोबाईलमध्ये नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं? त्यासाठी गार्डने त्याचा मोबाईल घेतला. तर त्या गार्डसोबत यांनी दादागिरी केली. त्याची कॉलर पकडली आणि 30-40 मुलांची तिथे गर्दी झाली आणि हे फक्त 2-3 लोकं असल्याने काही बोलू शकले नाही आणि त्या मुलीही घाबरून गेल्या. निघताना त्या मुलाने या मुलींना धक्काबुक्की केली.
हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..