मुंबई, 23 ऑगस्ट: कृषी विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, आयओटी सेन्सर्स आणि डेटा अॅनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा. कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका या पिकांसाठी ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशिएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांची निवड करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे’ शेती क्षेत्रात आर्टिफिशिएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प सादरीकरणाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ऑनलाईन व्ही. सी. द्वारे कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल,अपर मुख्य सचिव वित्त विकास चंद्र रस्तोगी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक मीनल करनवाल, सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रताप पवार, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अजित जावकर, मायक्रोसॉफ्टच्या सपना मोहरिया, कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रोटेक नाविन्यता केंद्राचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग दाभाडे, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हवामान बदल, पाणीटंचाई, जमिनीची घटती सुपीकता, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पाचा विभागनिहाय पिकवार अभ्यास करावा. पिकांची वाढ, पाण्याची गरज, जमिनीतील ओलावा, हवामान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य उत्पादन याबाबत विविध स्रोतांमधून माहिती संकलित करून एकत्रित सक्षम डिजिटल प्रणाली तयार करावी. मिळणाऱ्या माहितीचे मशीन लर्निंगच्या माध्यमातून विश्लेषण करून शेतकऱ्यांना पीकनिहाय आणि शेतनिहाय सल्ला देण्याची गरज आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ट्रस्टने ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडक पिके व निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करावी. ‘एआय’ आधारित सिंचन व्यवस्थापनामुळे पाण्याचा वापर कमी करावा. पिकासाठी या मॉडेलव्दारे पिकाचा उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मॉडेल विकसित करावे. शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.
‘शेती क्षेत्रात आर्टिफिशिएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग‘ प्रकल्पामुळे राज्यात परिवर्तन घडेल – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्पामुळे राज्यात परिवर्तन घडेल. एआय आधारित शेतीसाठी शासनाचा आग्रह असून हा प्रकल्प राज्यव्यापी राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळेल – प्रताप पवार
सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रताप पवार म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशिएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प राबविण्याचा घेतलेला निर्णय हा राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शासनाच्या पाठिंब्याशिवाय कोणताही प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही. या प्रकल्पामुळे शेतीच्या विकासाला चालना मिळेल व महाराष्ट्राच्या विकासासाठी हातभार लागेल, असेही ते म्हणाले.
एआय आधारित उपायांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल – निलेश नलवडे
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यांनी शेतीतील आव्हाने आणि बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा या पिकनिहाय विकसित केलेल्या ‘एआय’ आधारित शेतीतील पिकांची उत्पादकता वाढविण्याचा राज्याचा प्रकल्पाचे सादरीकरण केले. एआय आधारित ऊस शेतीच्या प्रायोगिक वापरात उत्पादनवाढीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 200 शेतकऱ्यांच्या नोंदींपैकी 164 वैध नोंदींमध्ये प्रारंभिक सरासरी उत्पादन 65.45 टन प्रति एकर, तर अंतिम सरासरी उत्पादन 73.12 टन प्रति एकर नोंदविण्यात आले. सरासरी उत्पादनवाढ 17.66 टन प्रति एकर वाढली आहे. ‘एआय’ आधारित सिंचन व्यवस्थापनामुळे सरासरी 42 टक्के पाणी बचतीची नोंद करण्यात आली असून, प्रति हेक्टर प्रतिदिन सुमारे 90000 हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते.ड्रोनच्या माध्यमातून घेतलेल्या पिकांच्या प्रतिमांचे एआय आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने विश्लेषण करून कीड व रोगांचा प्रारंभिक टप्प्यात शोध घेता येणार आहे. त्यानुसार सिंचन आणि फवारणीचे नियोजन करण्यासाठी संबंधित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची संकल्पना आहे. एआय आधारित शेतीच्या अंमलबजावणीत सध्या 10 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना चांगला अनुभव आला आहे. प्रकल्पाचा राज्यात येणारा खर्च हा पिकनिहाय सादर करण्यात आला. राज्यात पिकाचा करण्यात येणारा विस्तार याबाबतीत माहिती सादर करण्यात आली.






