धुळे – इलेक्ट्रॉनिक इकोसिस्टिम मध्ये धुळे शहरचा समावेश करावा, अशी मागणी भाजपच्या राज्य कार्यसमिती सदस्या व कॅन्सर सर्जन डॉ. माधुरी बोरसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. डॉ. माधुरी बोरसे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी ही महत्त्वाची मागणी केली.
धुळे जिल्ह्याचा मानवी निर्देशांक राज्यात सर्वात कमी आहे. धुळे जिल्ह्यात उद्योग व्यवसायाची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे धुळे जिल्हा आणि विशेष करून धुळे शहरात बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त आहे. बेरोजगारीमुळे अवैद्य व्यवसायाकडे तरुण वर्ग वळतो आणि त्यातून गुंडप्रवृत्ती फोफावते. धुळे शहराच्या इतिहासात त्यामुळेच वारंवार जातीय दंगली घडल्या आहेत. बेरोजगारीमुळे धुळे शहरात नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न भेडसावत असतो. बेरोजगारी, अवैध व्यवसा, गुंडगिरी, जातीय दंगली ह्या दृष्ट चक्रव्यूव्हातून रोजगार निर्मितीच धुळेकरांची सुटका करू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे व 5 हजार रोजगार निर्मितीचे इलेक्ट्रॉनिक हब महाराष्ट्र राज्याला मंजूर केले आहे. ह्या इलेक्ट्रॉनिक हबमुळे संपूर्ण राज्यामध्ये जवळपास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष 50 हजार रोजगार निर्मितीची इलेक्ट्रॉनिक इकोसिस्टिम होणार आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता धुळे शहराचा प्रथम टप्यामध्ये समावेश करून रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती भाजपच्या राज्य कार्यसमिती सदस्या व कॅन्सर सर्जन डॉ. माधुरी बोरसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मंजूर असलेले दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोअरमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश आहे. सदर कॉरीडोअरच्या कामाला गती देण्यासाठी विशेष भूमी अधिग्रहण अधिकारी यांची नेमणूक करावी, अशीदेखील मागणी याप्रसंगी डॉ. माधुरी बोरसे यांनी केली.
हेही वाचा – Dhule Politics : धुळ्यात ठाकरे गटाला धक्का, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश