सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 30 जुलै : प्रकल्पग्रस्त सोनबर्डी गावाचे पुनर्वसन त्वरित करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) डॉ. संभाजीराजे पाटील यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. डॉ. संभाजीराजे पाटील यांची सुरू असलेल्या “जन आशीर्वाद” संवाद यात्रेनिमित्ताने प्रत्येक गाव प्रत्येक घर संपर्क ते करीत आहेत. यावेळी मतदारसंघातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेणे, त्याच निराकरण करणे तसेच प्रलंबित विषय शासन दरबारी पोहोचविणे, इत्यादी कामे ते करत आहेत.
सोनबर्डी गावाची नेमकी समस्या काय? –
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील मौजे सोनबर्डी गावाच्या भेटी दरम्यान हे गाव अंजनी प्रकल्प निमित्ताने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या. मात्र, सदर गाव हे नदीला लागून असून दर पावसाळ्यात हे गाव पुराच्या पाण्याने वेढुन नागरिकांचे जीव हे धोक्यात असतात. त्याचबरोबर प्रत्येक पावसाळ्यात या गावाच्या भिंतींचे, गोठ्याचे, प्राणीमृत्यू असे अनेक घटनांनी नुकसान होत असते. अशातच गावाचा संपर्क तुटतो, गावातील नागरिक हे जीव मुठीत घेऊन गावातच अडकतात यात महिला व लहान बालके यांची विशेष चिंता असते. मागच्या वर्षी देखील काही गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली.
सोनबर्डी गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी –
सदर गाव हे प्रकल्प बाधित असल्याने या ठिकाणी कोणतेही नवीन विकासकामे होत नसल्याने परिस्थिती अधिक बिकट होत आहे. साधी शाळा देखील या गावात उपलब्ध नाही. हे निदर्शनास येताच या गावाच्या पुनर्वसन बाबत त्वरित निर्णय घेऊन, मौजे सोनबर्डी गावाच्या नागरिकांना या जीवघेण्या परिस्थितीतुन दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. संभाजीराजे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, यासाठी त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची भेट घेत त्यांना यासंबंधीचे निवेदन देखील दिले आहे.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा