ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 जून : जळगाव जिल्ह्यात काल रात्री झालेल्या विजेंच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला असून पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पितांबर आत्माराम वाघ (वय 50 वर्षे) असे मयताचे नाव असून संध्याकाळी साडे सात वाजेच्या त्यांच्या रहाते घरी वीज पडून त्यात ते मयत झाले. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी तसेच मोसंबी बागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बांबरूड (राणीचे) येथे वीज पडून एकाचा मृत्यू –
जळगाव शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली. तसेच पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथे सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पितांबर आत्माराम वाघ यांचा रहाते घरी वीज पडून मृत्यू झाला.घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. यानंतर घटनेचा पंचानामा करत त्यांच्या मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आज दुपारी बारा वाजता त्यांच्या बांबरूड राणीचे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे.
फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान –
बांबरूड राणीचे येथे काल रात्री साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून गावासह शेतशिवारात मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. तसेच काही ठिकाणी पत्रे उडाली आहेत. काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच जोरदार वाऱ्याच्या झोतामुळे अनेक केळीचे झाडे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासोबत मोसंबीच्या बागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी तसेच मोसंबीच्या बागा फुलवण्यासाठी शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली असताना अचानक आलेल्या आपत्तीमुळे त्यांचे कष्ट वाया गेले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हताश झाला असून शासनाने त्वरीत पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा : जळगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; घरांचे व दुकानाचे पत्र वादळाने उडाले तर अनेक ठिकाणी झाडे पडली