धुळे : भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या स्वप्नाने मेहनत घेत असलेल्या एका तरुणाची फक्त 2 गुणांनी संधी हुकली आणि यातून आलेल्या नैराश्यातून या तरुणाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपवली. खान्देशातील धुळे जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.
अक्षय यशवंत माळी असे 21 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत अक्षय यशवंत माळी हा धुळे तालुक्यातील रामी येथील रहिवासी होता. अवघ्या दोन गुणांनी भारतीय सैन्यदलातील त्याची संधी हुकली आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून अक्षयने आपल्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली.
अक्षय माळी या तरुणाला भारतीय सैन्यदलात भरती व्हायचे होते. यासाठी तो मेहनत करत होता. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती साधारण आहे. या परिस्थितीवर मात करीत तो बीएस्सीचे शिक्षण घेत देशसेवेचे स्वप्न पाहत होता. मात्र, फक्त 2 गुणांनी त्याची संधी हुकली आणि याच नैराश्यातून तो खचला.
दरम्यान, त्याने 25 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या मोडळ नदी परिसरातील शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी डॉ. विद्या गायकवाड यांनी तपासणी करीत त्याला मृत घोषित केले. याबाबत सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माळी कुटुंबियांची पोलीस अधीक्षकांनी घेतली भेट –
अक्षय माळी याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माळी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अक्षय माळी याची आत्महत्या मला अस्वस्थ करून गेली आहे, अशा भावना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी व्यक्त केल्या. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.