नवी दिल्ली, 25 एप्रिल : काश्मीरमधील पहलगामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर केंद्र सरकारने मोठी पावले उचलली असून दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानविरोधात देखील त्यांनी महत्वपुर्ण निर्णय घेतले आहे. यापैकीच पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत प्रवेश देण्यात येत होता. मात्र, हा प्रवेश रद्द करण्यात आलाय. यानुसार, पाकिस्तानी नागरिकांना शोधा अन् त्यांना तात्काळ परत पाठवा असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश नेमके काय? –
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून मोठी पावले उचलण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर विविध बैठकांचं सत्र पार पडत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला. यावेळी पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे आदेश दिले असून ‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि तात्काळ परत पाठवा’, अशा सूचना अमित शाह यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.
‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा अन् त्यांना तात्काळ परत पाठवा’ –
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी त्यांना 23 एप्रिलपासून पुढील 48 तासांची मुदत देण्यात आली होती. यानुसार, आता पाकिस्तानी नागरिकांना शोधा अन् त्यांना तात्काळ परत पाठवा, असे आदेशही गृहमंत्र्यांनी थेट आता राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर ‘कायेदशीर स्ट्राईक’ –
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशभरातील जवळपास 28 नागरिक मृत्युमुखी पडले. देशभरातील विविध भागातून पहलगामध्ये पर्यटनासाठी पर्यटक आले होते. यावेळी ही संधी साधत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर काही जण जखमी झाले. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरून दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जातेय. तर दुसरीकडे केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखत पाकिस्तानवर ‘कायेदशीर स्ट्राईक’ केलाय.