हैदराबाद, 8 जून : रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांचे आज सकाळी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. रामोजी राव यांना उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने 5 जून रोजी हैदराबादमधील नानकरामगुडा येथील स्टार हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे 4:50 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रामोजी राव यांचे पार्थिव त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील कार्पोरेट ऑफिसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून इथे त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि हितचिंतक त्यांच अंत्यदर्शन घेण्यासाठी येत आहेत.
रामोजी राव यांचा परिचय –
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावात रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी एका कृषी कुटुंबात झाला. रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स आणि मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. दरम्यान, रामोजी राव यांच्या निधनानंतर माध्यम क्षेत्रातील व्यक्तींसह सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली –
श्री रामोजी राव यांचे निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणाऱ्यांपैकी ते एक होते आणि त्यांच्या समृद्ध योगदानाने पत्रकारिता आणि चित्रपट जगतावर अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या उल्लेखनीय प्रयत्नांद्वारे, त्यांनी माध्यम आणि मनोरंजन विश्वात नावीन्य आणि उत्कृष्टतेसाठी नवीन मानके प्रस्थापित केली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. तसेच त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, ओम शांती! अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी रामोजी रावांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
हेही वाचा : Jalgaon to Mumbai Flight : आता जळगावहून मुंबईलाही विमानाने जाता येणार, तिकीट दर किती?