जळगाव , 3 जुलै: अमळनेर शहराचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या संत सखाराम महाराज संस्थानात लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मंदिर परिसराची सविस्तर पाहणी करून त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला तसेच संस्थानच्या विश्वस्तांशी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक माहिती जाणून घेतली.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “संत सखाराम महाराज हे अमळनेरचे ग्रामदैवत असून लाखो भाविकांच्या श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र आहेत. या पवित्र स्थळी लागलेली आग ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. शासन या संकटात संस्थानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. नुकसानीचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्याशी चर्चा करून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
पाहणी दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संत सखाराम महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर ते म्हणाले की, सखाराम महाराज संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी शासन स्तरावर आवश्यक प्रस्ताव सादर करून मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाचे संवर्धन आणि जतन करणे ही शासनाचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या पवित्र संस्थानातील आगीत अप्रतिम नक्षीकाम असलेला सुमारे ४०० वर्षे जुना सागवान लाकडाचा ऐतिहासिक सभामंडप पूर्णतः जळून खाक झाला असून संस्थानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
यांची होती विशेष उपस्थिती –
यावेळी संत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख विश्वस्त प.पू. श्री प्रसाद महाराज (गुरु ज्ञानेश्वर महाराज), विश्वस्त रविकांत देशमुख, जयंत मोडक, एकनाथ सातपूरकर, प्रसाद नाईक, संस्थानचे सल्लागार राजेंद्र भामरे, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक होते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरसेवक पंकज चौधरी, पंकज भोई, अबू महाजन, पांडू भोई, गुलाब पाटील, श्रीराम चौधरी, नाना धनगर, सुरज परदेशी, भैय्या परदेशी, रवी पाटील, नगरपालिकेचे व संबंधित विभागांचे अधिकारी, सेवेकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी यांचे केले कौतुक –
यावेळी आगीवर तातडीने नियंत्रण मिळवून मोठी हानी टाळणाऱ्या अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कार्याचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष गौरव केला. अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी तसेच कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख, जफर पठाण, सत्येन संदानशिव, आनंद झिम्बल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, रफीक पठाण, आकाश संदानशिव, लखन कंखरे, आकाश बाविस्कर आणि अजय बिऱ्हाडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संकटाच्या कठीण प्रसंगी जीवाची पर्वा न करता त्यांनी दाखविलेल्या धाडस, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे पालकमंत्र्यांनी मनापासून कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.






