जळगाव : मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींच्या छेडछाडप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही विचारांचा असो, ज्यानी हा गुन्हा केला असेल, त्याची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही केली पाहिजे, या शब्दात प्रतिक्रिया दिली.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात 6 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?
माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, याप्रकरणी मी पोलीस अधीक्षकांशी बोललो असून त्याठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. झालेली घटना फार वाईट आहे. हे कुणाच्याही कुटुंबासोबत घडू नये, अशा विचारांचे आम्ही लोक आहोत. याची चौकशी पोलीस विभागाने केलेली आहे आणि आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमच्यासारखे मंत्री आहेत, कुणीही येतं आणि फोटो काढतं आणि फोटो काढण्यासाठी काही नकार देता येत नाही. पण आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही विचारांचा असो, ज्यानी हा गुन्हा केला असेल, त्याची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही केली पाहिजे.
आरोपी कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा कोणत्याही मुलीवर असं होऊ नये आणि कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने केलं असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..