जळगाव, 29 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मोठं राजकारण तापण्याची शक्यता आहे. असे असताना माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ. सतीश पाटील यांनी अजित दादा गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुलाबराव देवकर काय म्हणाले? –
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे मी स्वतः जाहीर केले होते. त्यावेळी मी पहिला असा होतो की, मला अजित दादांच्या पक्षात प्रवेश करणार होतो. मात्र, काही कारणास्तव तो पक्षप्रवेश रखडला होता. पण माझ्या भूमिकेशी मी ठाम असून अजित दादांच्या पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले असल्याचे गुलाबराव देवकर यांनी जाहीर केले.
दरम्यान, मी काही किरकोळ कार्यकर्ता नाही. माझं पण वलय आणि व्हेटेज आहे. माझी देखील पक्षाला गरज असू शकते. म्हणून मला नाकारण्याचे काही कारण नाही. यामुळे कोणाच्या सांगण्यावरून कोणाचा पक्षप्रवेश थांबेल, असे होत नसते, असाही टोला त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लगावलाय. आज जळगावात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते.
निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर, दहा वर्षांपासून विरोधात असल्याने पुन्हा एकदा पाच वर्ष आपल्याला विरोधात काढावी लागतील. यामुळे आपण अजित दादांच्या पक्षात जाऊन सत्तेत गेले पाहिजे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी एकमताने घेतली होती. यामुळे मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडत असल्याचे गुलाबराव देवकर यांनी जाहीर केले.
डॉ. सतीश पाटील काय म्हणाले? –
गेल्या दोन-तीन दिवसांपासून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे देखील अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पारोळ्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलवली. त्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सतीश पाटील म्हणाले की, गेल्या 30 ते 35 वर्षांपासून पवार साहेबांना दैवत मानून माझी राजकीय वाटचाल राहिलीय. गेल्या निवडणुकीत पवार साहेबांसोबत राहून मी तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढली. यामुळे पवार साहेब माझे कालही आणि आजही दैवत आहेत. मात्र, आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत काम केले. अशा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही. म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आज मी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती.
आपण अजित दादांच्या राष्ट्रवादीत गेलं पाहिजे, अशा भावना या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. तसेच शरद पवार हे आमचं दैवत आहेतच. पण स्थानिक राजकारणात माझ्या विरोधातील आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यांना अनेक अधिकारी बळी पडतील. यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींना कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागतो. यामुळे आपण ज्या पक्षाच्या विचाराशी बांधील राहिले तेच नेते अजित दादा उद्या आपलं नेतृत्व करताना आपल्याला न्याय देतील, अशापद्धतीने आम्ही पक्षप्रवेशाच्या निर्णयाकडे गेलेलो आहोत.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपुर्वी माझी अजित दादांसोबत चर्चा झाली. त्यानुसार येत्या 3 मे रोजी मुंबईत येऊन पक्षप्रवेश करणार असून त्यानंतर मतदारसंघात अजित दादांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे मोठे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सतीश पाटील यांनी दिलीय. तसेच सुप्रिया सुळे यांना देखील पक्षप्रवेशाची माहिती दिलीय. पक्ष सोडण्याचं दुःख तर आहेच पण शेवटी कार्यकर्त्यांच्या बळावरच राजकारण असतं, आणि त्यांना असं अधांतरी सोडण्यापेक्षा त्यांना एक चांगला पक्ष तसेच नेतृत्व मिळावं, यामुळे अजित दादा गटात जाण्याचे आमचे निश्चित झाले असून येत्या 3 मे रोजी आम्ही प्रवेश करणार असल्याचेही डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.