जळगाव, 20 एप्रिल : राज्यातील हवामानात मार्च महिन्याच्या मध्यापासून अनेक बदल झाले असून कधी अवकाळी पाऊस तर कधी अवकाळीचे ढग तर कधी कडाक्याचे उन अशी परिस्थिती दिसत आहे. असे असताना राज्यात पुन्हा एकदा तापमानाचा पार चढल्याने उन्हाचा तीव्र तडाखा जाणवतोय. दरम्यान, पुढील काही दिवस तापमानाचा पारा हा 44 अंशावर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात उन्हाचा तीव्र तडाखा –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सूर्याचा पारा चढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, उत्तर तसेच मध्य महाराष्ट्रात पारा चढताना दिसत आहे. असे असताना पुढचे तीन दिवस तापमाचा पारा हा 44 अंशावर जाईल. यामुळे कडाक्याचा उन्हाचा सामना हा नागरिकांना करावा लागू शकतो.
जळगावचे हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने चाळीशी पार केली असून काल शनिवार रोजी 43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली. अशातच आता पुढील तीन दिवस तापमान वाढणार असून 44 अंशावर ते जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एकीकडे सकाळी दहा वाजेपासून उन्हाचे चटके बसायला सुरूवात झालीय तर दुसरीकडे उन्हाच्या तापमानात वाढ होतेय. यामुळे नागरिक उन्हापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत. पुढील काही दिवस उन्हाचा तीव्र तडाखा नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
जळगावचे पुढील तीन दिवसांचे तापमान –
- रविवार, 20 एप्रिल – 44 अंश सेल्सियस – निरभ्र आकाश
- सोमवार, 21 एप्रिल – 44 अंश सेल्सियस – निरभ्र आकाश
- मंगळवार, 22 एप्रिल – 44 अंश सेल्सियस – निरभ्र आकाश
वाढत्या तापमानापासून काळजी घेण्याचे आवाहन –
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून सध्या दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे विदर्भापासून, तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय. यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.