सोलापूर : गेल्या काही दिवसात राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच आर्थिक फसवणुकीचेही प्रकार समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या भिशीमुळे कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली.
पत्नीच्या हत्येसोबतच आरोपीने स्वत:च्या मुलावरही हल्ला केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये ही घटना घडली. मनिषा अनंत साळुंखे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर तेजस अनंत साळुंखे असे जखमी मुलाचे नाव आहे.
दरम्यान, याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती हा खासगी शिकवणी घेतो. तुझ्या भिशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे, असे म्हणत या खासगी शिकवणी घेणाऱ्या पतीने पत्नीची हत्या केली.
आधी त्याने पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसवून शेतात नेले. त्यानंतर शेतात नेल्यानंतर पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळला आणि चाकू, दगडाने मारहाण करून हत्या केली. यानंतर त्याने स्वत:च्या मुलावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या नागोबाचीवाडी शिवारात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी अनंत रामचंद्र साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्याला त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत समर्थ अनंत साळुंखे याने तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.