मुंबई, 31 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेतील 20 हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता शनिवार, 2 ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित 2 ऑगस्ट रोजी वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता वितरित केला जाणार आहे.
केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक –
यासंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीत 2 ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. देशभरातील 731 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुख दूरद्श्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत कृषी सचिव देवेश चतुर्वेदी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट आणि कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांना या कार्यक्रमाशी जोडण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आणि देशव्यापी स्तरावर मोहिमेच्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रूपरेषा तयार करण्याचे निर्देश दिले.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान काय म्हणाले? –
कृषी विज्ञान केंद्रांना तयारीबाबत मार्गदर्शन करताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 6000 रुपयांची रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता वितरित केला जातो. यामुळे शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याची संधी मिळते. यात केव्हीके यांची महत्त्वाची भूमिका आहे. यंदाही केव्हीके यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी तयारीला सुरुवात करावी. हा कार्यक्रम शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याबरोबरच जनजागृती मोहिमेचे माध्यम आहे, त्यामुळे हा कार्यक्रम उत्सव आणि मिशनच्या स्वरूपात आयोजित व्हावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कटिबद्धतेने काम करावे –
कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान पुढे सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता वितरणाचा 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा कार्यक्रम शेतकऱ्यांना लाभ आणि कृषी क्षेत्रातील विकास योजनांशी जोडण्याची संधी आहे. कृषी सखी, ड्रोन दीदी, बँक सखी, पशु सखी, विमा सखी आणि ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती द्यावी. खरीप हंगामाशी संबंधित विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला जाऊ शकतो. दरम्यान, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी करून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कटिबद्धतेने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.
काय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना? –
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये दिले जातात. यामध्ये एका वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती आणि अद्याप ही योजना सुरु आहे. तसेच आता एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय हा पीएम किसान योजनेसंदर्भात घेत शेतकऱ्यांना 18 वा हप्ता मंजूर करण्यात आला.
9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार –
दरम्यान, आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेत 19 हप्ते वितरित करण्यात आले असून 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 3.69 लाख कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत. 20 व्या हप्त्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,500 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.
हेही वाचा : ई-पॉस प्रणालीतून खत विक्री बंधनकारक – महाराष्ट्र शासनाचा सर्व खत विक्रेत्यांना इशारा