नवी दिल्ली, 10 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारत-पाकच्या युद्धाला पुर्णविराम मिळाल्याचे जाहीर करत दोन्ही देशांचे अभिनंदन केले. यानंतर आता भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली असून परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज सांयकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट –
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानच्या वाढत्या संघर्षावर मध्यस्थी करण्याची सहमती दर्शवली होती. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ‘एक्स’ पोस्ट करत सांगितले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.”
ट्रम्प यांच्या ट्विटनंतर भारताच्या भूमिकेकडे लागलं होतं लक्ष –
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनंतर तात्काळ भारताकडून अधिकृतपणे भूमिका जाहीर करण्यात आली नव्हती. दरम्यान, पाकिस्तानकडून 3 वाजून 35 मिनिटांनी अधिकृतपणे फोन आल्यानंतरच भारताने शस्त्रसंधी निर्णयाची घोषणा केली आहे.
पराष्ट्र सचिवांची पत्रकार परिषदेत माहिती –
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. यावेळी दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार 5 वाजतापासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, आज या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या असून लष्करी ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील, अशी माहिती मिस्त्री यांनी दिलीय.
अखेर, भारत-पाकमध्ये युद्धविराम –
काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत भीषण हल्ला केला होता. यामध्ये निष्पांप पर्यटकांना जीव गमावावा लागला. दहशतवाद्यांच्या पहलगाम हल्लानंतर भारताने रणनिती आखली आणि 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करत ती उद्ध्वस्त केली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असता दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू होते. मात्र, आज परराष्ट्र सचिवांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी थांबविण्याची घोषणा केल्यांतर अखेर युद्ध विराम मिळाला आहे.
हेही वाचा : गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर, ‘या’ तारखेला वेळेआधीच केरळमध्ये धडकणार