जळगाव, 6 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील 12 हजार 508 शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक तसेच ग्रामसेवक यांच्यामार्फत ई- केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. तरी देखील अद्यापही शेतकऱ्यांनी e-KYC न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्या सर्वांनी ई -केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
शेतकरी मदतीच्या अनुदानापासून वंचित –
जळगाव जिल्ह्यातील सन-2022 पासून शेतीपिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार, 2 लाख 13 हजार 416 शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन डीबीटी प्रणालीद्वारे जवळपास 244 कोटी अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. मात्र जिल्ह्यातील 12 हजार 508 शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे युट्यूब चॅनल सब्सस्क्राईब करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews
प्रशासनाने ई-केवायसी करण्याचे केले आवाहन –
दरम्यान, गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांचेमार्फत ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले आहे. तरी देखील अद्यापही काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ई – केवायसी न केल्यामुळे अनुदानापासून वंचित आहेत. विशेषत: माहे जानेवारी 2024 ते माहे मे 2024 या कालावधित जिल्ह्यातील भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा, अमळनेर व जामनेर या तालुक्यात अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानपोटी 5 हजार 854 शेतकऱ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करता आले नाही.
तरी संबंधित शेतकरी यांनी सीएससी केंद्र व महा ई-सेवा केंद्र येथे जाऊन ई-केवायसी करावे व आपले शेतपिकाच्या नुकसानीचे अनुदान त्वरीत प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा : “अमित भाईंनी जर सांगितलं तर…….,” एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत मंत्री महाजन नेमकं काय म्हणाले?