जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा जळगाव जिल्ह्यात दारुण पराभव झाला. दुसरीकडेच दोन दिवसांपूर्वीच धुळे जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यानंतर आता जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हाप्रमुखांनी पक्ष सोडल्यानंतर आता पक्षाच्या महिला जिल्हा संघटक महानंदा पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षात अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. तसेच पक्षाचे काम करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप महानंदा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महानंदा पाटील यांनी आपला दोन पानांचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.
VIDEO : Mla Amol Patil : पहिलंच अधिवेशन, शेतकरी केंद्रस्थानी, एरंडोलच्या आमदारांशी नागपूर येथून विशेष संवाद
महानंदा पाटील यांनी आपल्या या राजीनामा पत्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या बैठकीत पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांकडून भर मेळाव्यात अपमानास्पद वागणूक देण्यात आली. याबाबत इतर महिला पदाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली असता, त्यांच्याकडूनही तशीच वागणूक देण्यात आली.
तसेच संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतानाही अनेक वेळा बसूनही भेट दिली जात नव्हती. त्यामुळे पक्षाचे कोणतेही पद ठेवण्याची इच्छा नसल्याचे सांगत महानंदा पाटील यांनी पश्न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता जळगाव जिल्ह्यात आधीच विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाल्यामुळे महानंदा पाटील यांनीही राजीनामा दिल्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने आता ठाकरे गटासमोर पक्षबांधणीचे मोठे आव्हान आहे.
VIDEO : Raju Mama Bhole : जळगाव शहराच्या विकासासाठी राजूमामांचं व्हिजन काय, नागपूर येथून विशेष संवाद