जळगाव, 13 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, ‘मेरा युवा भारत’, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने “जयभीम पदयात्रा” चे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले.
या पदयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्रणव कुमार झा, महानगरपालिकेचे अधिकारी चंद्रकांत वानखेडे, सुनिल गोराणे, सुमित जाधव, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पदयात्रेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांतील सुमारे 500 विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू, समाज कल्याण वसतिगृहातील विद्यार्थी, एनसीसी, शासकीय मिलिटरी वसतिगृहाचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी रविंद्र नाईक यांनी संविधान वाचन केले.
“जयभीम पदयात्रा” क्रीडा संकुल येथून सुरू होऊन रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत झाली. तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. पदयात्रेदरम्यान सहभागी पदयात्रींसाठी इकरा उर्दू हायस्कूलचे चेअरमन एजाज मलिक यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे विद्यार्थ्यांना टोप्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इकबाल मिर्झा, वसीम मिर्झा, शहजाद शेख, रणजीत पाटील, राहुल चौधरी, मीनल थोरात, विशाल बोडके, सचिन निकम, किशोर चौधरी, चंचल माळी, सोनल विचवेकर, संजय माहिरे, उमेश मराठे, विनोद कुलकर्णी, विनोद माने आदींचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन नरेंद्र डागर यांनी केले.