नागपूर : जळगाव ते छत्रपती संभाजीनगर प्रवासाला नवे गतीशील वळण मिळाले आहे. आता जळगाव ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास अवघ्या 1 तासात पूर्ण होणार आहे.
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. परवा 22 जून रोजी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास अवघ्या १ तासात पूर्ण होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
औट्रम घाटातील बोगदा (टनल) आणि व्हायाडक्ट या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, यामध्ये पहिल्या टप्प्यात १२.७५ किमी लांबीच्या रस्त्याच्या बोगद्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे २६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला औट्रम घाटातील प्रकल्प मार्गी लागणार असून, चाळीसगाव, खान्देश आणि मराठवाडा यांच्यासाठी हा एक क्रांतिकारी टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ना केवळ अंतर कमी होईल, तर वाहतूक सुरळीत होऊन आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे.
या बैठकीला मा. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार सौ. देवयानी फरांदे, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या ऐतिहासिक निर्णयासाठी खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.