जळगाव, 19 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत असताना परतीच्या पावसाने जळगाव जिल्ह्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. मागील आठवड्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे नुकसना झाले असताना काल झालेल्या पावसामुळे कापूस, सोयबीन तसेच मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील या भागात जोरदार पाऊस –
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, भडगाव आणि पाचोरा तालुक्यात परतीच्या पावसाने शुक्रवारी सायंकाळी दीड तास हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, या जोरदार पावसामुळे अनेक भागात विजेचा प्रवाह खंडित झाला होता. यात कापूस ओला झाला असून मका आणि सोयाबीनला सततच्या पाण्यामुळे कोंब फुटले आहेत.
जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळतोय. यामध्ये कुठे ऊन तर कुठे पाऊस पडत आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यातील विविध भागात सायंकाळी किंवा रात्री विजेंच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, ऐन कापूस घरात येत असताना परतीच्या पावसाने मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत