मुंबई, 10 जानेवारी : संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाला ज्या निकालाची उत्सुकता होती तो निकाल आता समोर येत आहे. शिवसेना आमदार अपात्र सुनावणी प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीला शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा? यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. शिवसेना पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार मलाच असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण, 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे म्हणून एकनाथ शिंदे सह सोळा आमदारांना अपात्र करता येणार नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितले.
दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या : नार्वेकर
खरी शिवसेना कोणती यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, “शिवसेनेची घटना काय आहे आणि त्यानुसार पक्ष कुणाचा याचा अभ्यास, निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहेत. 2018 सालची घटना ही यामध्ये महत्त्वाची मानली आहे. घटनेच्या 10व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची? अधिकृत व्हीप कुणाचा? बुहमत कुणाचं हे ठरवणं होतं, 2018 मधील घटनेच्या दुरुस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही त्यावेळी सर्वांच्या संमतीने, घटना, नेतृत्व, विधिमंडळ पक्षाचं बहुमत, हे पक्ष ठरवताना महत्वाचे घटक होते.
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करता येणार नाही –
10व्या शेड्युलनुसार मला फक्त राजकीय नेतृत्व बघायचे आहे. पक्षाचा प्रमुख कोण, एवढंच मी ठरवणार आहे. 2018 मध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही म्हणून तेव्हाची घटनादुरुस्ती चूक आहे. असेही नार्वेकर म्हणाले. तसेच 2018ला ठाकरे गटाने केलेली घटनादुरुस्ती नियमबाह्य आहे. 2023 ला जी घटना दिली तीच ग्राह्य धरत असल्याचेही नार्वेकर म्हणाले. उलटतपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य करत आहे. तसेच शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र करता येणार नाही, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 14 आमदार पात्र –
उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या मागण्या फेटाळून लावल्या असल्या तरी 14 आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनिल राऊत, सुनिल प्रभू, भास्कर जाधव, रमेश कोरगावंकर, प्रकाश फातर्फेकर, कैलास पाटील, संजय पोतनीस, उदयसिंह राजपूत, राहुल पाटील हे सगळे आमदार पात्र ठरले आहे