लंडन, 20 मार्च : शेतकरी साहेबराव करपे आणि कुटुंबीयांनी 19 मार्च 1986 रोजी आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या होती. या अनुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसीय अन्नत्याग महाराष्ट्रात केला गेला. याच पार्श्वभूमीवर काल शेतकरीपुत्र, चेवेनिंग स्कॉलर डॉ. ऋषीकेश आंधळकर आणि ॲड. दीपक चटप यांनी सातासमुद्रापार लंडन येथे एकदिवसीय अन्नत्याग केला. यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनलगत असलेल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर त्यांनी उपोषण करत शेतकरी आत्महत्येबाबत सहवेदना व्यक्त केली.
मूळात शेतकरी परिवारात वाढलेले अॅड.. दीपक चटप हे चंद्रपुर जिल्ह्यातील आहे. पाथ या कृतीयुक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकरी, कामगार, आदिवासी आदींच्या प्रश्नांना रचनात्मक मार्गाने वाचा फोडण्याचे काम ते करत आहे. त्याचबरोबर डॉ. ऋषीकेश आंधळकर यांनी इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे.
या कामाची दखल घेत यंदा दोघांनाही ब्रिटिश सरकारने 45 लाखांची चेवेनिंग शिष्यवृत्ती मिळाली. या माध्यमातून सध्या लंडन येथे त्यांचे उच्चशिक्षण सुरू आहे. याच अनुषंगाने या दोन स्कॉलर्सचे लंडन येथील एक दिवसीय उपोषण महत्वाचे ठरले. काल 19 मार्चला लंडन येथे डॉ. ऋषीकेश आंधळकर आणि अॅड. दिपक चटप यांनी ‘एक दिवस शेतकऱ्यांसाठी’, शेतकऱ्यांसाठी सहवेदना म्हणून अन्नत्याग केला.
2017 पासून दर वर्षी शेतकरी आत्महत्या सहवेदना जपत उपोषण, उपवास किंवा अंन्नत्याग केला जातो. या वर्षी विविध शेतकरी संघटनांसह अनेक स्थानिक संस्था व संघटना या उपवास आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
सिलिंग कायदा, आवश्यक वस्तु कायदा, भूमी अधिग्रहण कायदा आदी शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे, कृषी न्यायाधिकरणाची निर्मिती व्हावी आणि शेतमालाला रास्त भाव देणारी यंत्रणा उभी झाल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाही. प्रत्येक जीव महत्वाचा असुन नागरिक म्हणून शेतकऱ्यांविषयी संवेदना जपाव्या आणि धोरणात्मक बदल करण्यासाठी पाऊले शासनाने उचलली पाहिजे, असे मत यावेळी अॅड. दीपक यांनी मांडले.
तर राज्यात विविध भागात किसानपुत्रांनी सहभाग घेतला, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी दिली. दरम्यान, दोन स्कॉलर्सने लंडन येथे केलेल्या उपोषणाने आंदोलनाची अधिक चर्चा झाली.