अंतरवाली सराटी (जालना), 14 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. प्रकृती खालावल्याने आता सलाईनही न लावता त्यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचे दिसून येत असताना अंतरवाली सराटीतून मराठा समाजाला त्यांनी भावनिक साद घातली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? –
अंतरवाली सराटी येथे आज 14 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांग पाटील म्हणाले की, मुंबईला एकट्याने जाणार असून चार-पाच सहकारी सोबत असतील. मला उठून उभे राहणेही शक्य होत नाही. त्यामुळे रस्त्यात माझ्या सत्काराचे नियोजन करू नका. बोलता आले तर भाषण करेन; मात्र मला भेटण्यासाठी येण्यावर कोणतेही बंधन नाही. दरम्यान, ही शक्यतो माझी गोदा पट्ट्याशी आणि महाराष्ट्राशी शेवटची भेट असू शकते. त्यामुळे आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर या, मात्र मुंबईला येऊ नका, अशी भावनिक साद त्यांनी मराठा समाजाला घातली.
“मला समाजाला हरू द्यायचे नाही. जिथे देह टेकेल तिथे टेकेल; मात्र मराठ्यांनी अभिमानाने मान उंचावेल, अशा पद्धतीने लढले पाहिजे. समाजातील लेकरांची मान उंचावली पाहिजे. ‘मेला पण हटला नाही’ असे लोकांनी म्हटले पाहिजे,” असे जरांगे यांनी सांगितले.
“मला असं खितपत पडून मरायचं नाही, तर समाजाला काहीतरी देऊन मरायचं आहे. समाजाची प्रतिष्ठा इंचभरही ढळू द्यायची नाही. प्रत्येक घरातील वयोवृद्ध व्यक्तीने अभिमानाने म्हणावे की, ‘असं पोरगं मराठ्यांच्या पोटी जन्माला आलं.’ शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या तोंडात समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळावे, हाच शब्द होता. तो पळून गेला नाही, छातीवर गोळ्या झेलल्या; पण आंदोलनातून मागे हटला नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाच्या मागणीसाठी कोणापुढेही शरण जाणार नाही किंवा झुकणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
“तुमच्या लेकरांसाठी कोणापुढेही झुकायचे नाही. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकायचा आहे,” असे ते म्हणाले. आंदोलन चिरडण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा आणि दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोपही त्यांनी केला.
“मराठा समाजाला नेत्यांची कमतरता नाही. एक नेता नाही तर दुसरा नेता आहे. जो आरक्षण देईल, त्याला निवडून आणायचे. तुमच्या आवडीचा नेता किंवा पक्ष महत्त्वाचा नाही; तुमच्या लेकरांचे कल्याण कोण करणार, हे महत्त्वाचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाज कोणत्याही क्षणी मुंबई ठप्प करू शकतो, असा दावा करताना राजकारणी आणि श्रीमंत मराठ्यांची संख्या मर्यादित आहे; मात्र मोठ्या संख्येने असलेला सामान्य मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटू शकतो, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
हेही वाचा: Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा






