बीड, 16 सप्टेंबर : “मी मुंबईला जाणार आहे. थांबणार नाही, हटणार नाही,” अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पाटोदा येथे आयोजित पत्रकार परिषदेतून मांडली. आज मुंबईकडे रवाना होणे शक्य झाले नाही. त्यामुळे उद्या (१७ सप्टेंबर) दुपारी १ वाजेनंतर मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे जाण्याचा निर्णय कायम –
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा बुधवारी १९वा दिवस आहे. सध्या ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असून उपोषणामुळे अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांनी सलाईन घेतल्याचे तसेच पाणी प्यायल्याचे सांगितले. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जात असून प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, प्रकृतीची पर्वा न करता मुंबईकडे जाण्याचा निर्णय कायम असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील यांचं मराठा बांधवांना आवाहन –
“सरकारने आम्हाला रस्त्यावर जास्त वेळ थांबवू नये. मला कोण अडवते ते पाहू. अडवले तर महाराष्ट्राला सांगतो,” असे जरांगे पाटील म्हणाले. पाटोदा येथे थांबलेले मराठा बांधव गावाकडे किंवा अंतरवाली सराटीकडे परत जावेत, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईच्या मार्गावर श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली येथे मुक्काम न करता थेट मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपण सांगितलेल्या दिवशीच मुंबईला यावे, असे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.
सरकारचा ड्राप्ट पाहिल्यानंतरच भूमिका मांडणार –
सरकारकडून आलेल्या ड्राफ्टबाबत आज माहिती मिळाल्याचे सांगत, तो पाहिल्यानंतरच त्यावर भूमिका मांडणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. शिंदे समितीच्या जीआरप्रमाणे काम झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात सुधारित जीआर काढण्याची मागणीही त्यांनी केली.
१३ पैकी १२ मागण्या मान्य झाल्याचा दावा –
“आमच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र, हैदराबाद जीआरचे काय झाले, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे,” अशी मागणी जरांगे यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठवाड्यातील मराठा समाजालाही आरक्षणात समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेचे एक मंत्री आणि अन्य दोन मंत्री पाटोद्याला येणार असल्याची माहिती मिळाल्याचे जरांगे यांनी सांगितले. “काम करणार असतील तरच या,” असे आवाहन त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना केले. तसेच, शंकरगडाच्या महंतांच्या सांगण्यावरूनच आपण सलाईन घेतले आणि पाणी प्यायलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: ‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’






