आव्हाणे (जळगाव), 26 जानेवारी : अनेकांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग केलं, पण मी कधी त्यांच्याकडे गेलो नाही. ज्या माणसाला पद द्यायची असतात, त्याला किती टेन्शन असतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यांनी विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा मला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आव्हाणे येथील आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.
नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –
आव्हाणे येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तीन जणांचं सरकार असल्यामुळे सरकारमध्ये थोड्या कसरती आल्या. पण जनतेच्या आशीर्वादाने चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी मला मिळाली. मंत्री होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेच वरिष्ठ आमदार होते. आपल्या महाराष्ट्रात 70 आमदार हे तिसऱ्यांना विजयी झाले आहेत. 40 आमदार हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत आणि आम्ही 20 आमदार असे आहोत, जे पाचवेळा निवडून आले आहोत. त्यामुळे मंत्री होईल की नाही, याची शाश्वती नव्हती.
पण ज्यावेळी उपमुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेसाहेबांनी नकार दिला, त्यावेळी आम्ही सर्वांनी विनंती केली की आपण सत्तेत असले पाहिजे. कारण, एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे. देवेंद्रभाऊ सुद्धा आपल्या काळात उपमुख्यमंत्री झाले होते. त्यांनी मोठी मन दाखवलं होतं. तर आपणही मोठं मन दाखवलं पाहिजे आणि उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे, शेवटी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत. त्यांनी सगळ्या आमदारांचा याठिकाणी मान ठेवला.
अनेकांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग केलं, पण मी कधी त्यांच्याकडे गेलो नाही. ज्या माणसाला पद द्यायची असतात, त्याला किती टेन्शन असतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यांनी विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा मला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली.
जेव्हा आम्ही प्रचारात फिरायचो, तेव्हा मी 100 टक्के निवडून येईल, असा आत्मविश्वास मला होता. पण मला सांगायला अभिमान वाटेल, ज्या समाजाचं भांडवल देवकर आप्पांनी केलं, त्याच मराठा समाजाने मला 45 टक्के मते दिली. त्यामुळे सामाजिक वातावरण पूर्ण धुतलं गेलं. कोळी समाज, लेवा पाटील समाज, धनगर समाज आपल्यासोबत 80 टक्के राहिला. मराठा समाजासह सर्व लहान समाज आपल्यासोबत राहिले.