जळगाव, 16 जानेवारी : आमदारांना परत आणण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ऐकण्याची मानसिकता असावी लागते. कधीकधी गर्व फार नडतो, या शब्दात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंबाबत भाष्य केलं. राज्यात जून महिन्यात शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर अजूनही दोन्ही गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यानंतर आता राज्याचे पाणीपुरवठामंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंबाबत भाष्य केलंय.
नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –
“जे करायचं ते बिंधासपणे करायचे. आपण काय बघोडे नव्हतो. आपण तर जाऊन सांगून आलो होतो. असं नाही की गपचूप पळून गेलो. आधी साहेबांकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं होतं की, जे घडतंय, ते दुरुस्त करुन घ्या. 40 आमदारांपैकी मी 33 वा होतो. माझ्याआधी 32 जण चालले गेले होते. पण मी तिकडे न जाता आधी उद्धव ठाकरेंना सांगायला गेलो आणि तिथे सांगितलं की, हे दुरुस्त करायला हवं.”
“अजित दादांनी पण सकाळी शपथ घेतली होती. पण त्यांना हे दुरुस्त करुन संध्याकाळपर्यंत परत आणता आलं. हा प्रयत्न जर कदाचित आमच्या नेत्यांनी केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ऐकण्याची मानसिकता असावी लागते. आपचे 13 आमदार दिल्लीमध्ये गायब झाले होते. तर केजरीवाल यांनी परत आणले की नाही. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांच्या मुलाचे 6 आमदार गायब झाले होते. ते परत आणले की नाही. हे पण आणू शकले असते. पण कधीकधी ग (गर्व) फार फार नडतो”, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
हेही वाचा – खान्देशपुत्राचा सन्मान! खासदार उन्मेश पाटील यांची दावोस परिषदेसाठी निवड, वाचा सविस्तर?
ज्या ताटात खाल्लं त्या ताटात… –
तसेच ते पुढे म्हणाले की, भाडेकरू माणूस सुद्धा आपल्या घरात राहिला तर त्याला आपुलकी होऊन जाते. मी 35 वर्ष एकाच घरात राहिल्यामुळे इच्छा होत नाही जास्त बोलायची. कारण शेवटी ज्या ताटात खाल्लं त्या ताटात वाईट करायची ही आमची संस्कृती नाही, त्यामुळे त्यांना काय बोलायचे ते मी वेळ आल्यावर बोलेन असेही ते म्हणाले.