भडगाव, 9 मार्च: जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणासह 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवार 8 मार्च रोजी घडली. नदीम खान नसीम खान (वय 27) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय 16) असे पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी काही लहान मुले गिरणा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरली असताना ती खोल पाण्यात अडकली. दरम्यान, काही मुले पाण्यात बुडत असल्याचे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नदीम खान या तरुणाच्या लक्षात आले. नदीमने त्यांना वाचवण्यासाठी तत्काळ नदीत उडी घेतली. मुलांना बाहेर काढण्याच्या प्रयत्न करत दोन मुलांना पकडून सुरक्षित बाहेर देखील आणले. मात्र, नदीपात्रातील खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने नदीम खान याच्यासह काफिया शरीफ पिंजारी या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. मात्र, दोघांनाही बाहेर काढल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भडगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाचे अविनाश जंजाडे व प्रशांत कुंभारे, पोलिस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे, इकबाल शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली. नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका यांना तातडीने सूचना दिल्या. तसेच नगरसेवक आसिमभाऊ अलीम शाह व डॉ. विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले
नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून नदीत शोधमोहीम राबवण्यासाठी कर्मचारी पाठवले. आरोग्य विभागाचे छोटे वैद्य, अजय कंडारे तसेच पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा यांनी शोध व मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मते नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे अनेक ठिकाणी खोल खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






