चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 12 जून : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने 11 जून रोजी रात्री 7 ते 8 वाजेच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. यामध्ये पाचोरा-भडगाव तालुक्यातील अनेक भागात केळी तसेच मोसंबीच्या बागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील यांना आज तातडीने मुंबईहून पाचोऱ्याला येत नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केली. या पाहणीनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज’सोबत बोलताना महत्वपुर्ण माहिती दिली.
नुकसानग्रस्त भागात आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट –
पाचोरा-भडगाव तालुक्यातील अनेक भागात वादळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत बाळद, लोहठार, वडदे, कोठली, पहाण तसेच खेडगाव आदी भागात भेट देत नुकसानग्रस्त केळीबागांची पाहणी केली. यावेळी प्रातांधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोड, तहसिलदार शीतल सोलाट, नायब तहसीलदार विनोद कुमावत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील , तालुकाप्रमुख विनोद तावडे, महेश सोमवंशी, कृषी विभागातील अधिकारी तसेच संबंधित गावांचे तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, आदी उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना म्हणाले की, पाचोरा-भडगाव तालुक्यात परवा 11 जून रात्री झालेल्या नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मुंबईहून आज पाचोऱ्यात पोहचलो. यानंतर आज सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत फोनवरून संवाद साधत त्यांना नुकसानीबाबत माहिती दिली.
दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसिलदारांना तात्काळ पंचमान करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, मी प्रत्यक्षात ज्यावेळी पाहणी करायला गेलो. तेव्हा लक्षात आलं की माझ्या 25 वर्षांच्या इतिहासात मतदारसंघात आजपर्यंत असं वादळ मी देखील पाहिलं नाही. ज्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
आमदारांनी दिला 2019 चा संदर्भ –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, कोठली ते बोरनारपर्यंत 2019 साली मोठं वादळ आलं होतं. ज्या वादळामुळे 200 ते 250 हेक्टर केळी उद्धवस्त झाली होती. त्यावेळी केळीचे झालेले नुकसान पाहून एका शेतकऱ्याला जागीच ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्याचप्रमाणे, सध्यास्थितीत अधिक भयानकची परिस्थिती आताची आहे. मोठ्या प्रमाणात केळीबागांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी हा वर्षभर मेहनत घेऊन पीक हाताशी आले असताना त्या उत्पन्नातून काही तरी करण्याचे नियोजन करतो. मात्र, प्रत्यक्षात अशापद्धतीने पीकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात वेदना होतात. आणि आज केलेल्या पाहणीतून शेतकऱ्याच्या ह्या वेदना जाणून घेतल्या. दरम्यान, माझ्या शेतातील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे मी देखील एक शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचे दुःख समजतं, असेही आमदार पाटील म्हणाले.
आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, वडदा येथील दीपक पाटील या शेतकऱ्याचे 38 हजार केळीचे खोड आहेत. प्रांताधिकारी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांसह मी ज्यावेळी त्या शेतकऱ्याशी चर्चा केली त्यावेळी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून आले. खरंतर, एवढ्या मोठ्या प्रमाणात केळीबागांचे नुकसान झाल्याने पुढील चार-पाच वर्ष काय करावं हे त्या शेतकऱ्याला समजणार नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर निर्माण झालीय.
तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार –
पाचोरा-भडगाव तालुक्यातील गोराडखेडा ते जळगावपर्यत हे वादळ होते. यामध्ये पहाण, खेडगाव बांबरूड (रा.) तसेच सामनेर या भागांतील शेतकऱ्यांचे केळी, मोसंबी, लिंबू तसेच पपई या चार पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता पंचानामे करण्यात आले असून शासनाकडून तात्काळ मदत मिळण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
कृषी विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापनच्या काही अटींमुळे जून 2019 साली 250 हेक्टर केळीच्या नुकसान भरपाईची मदत मिळवून देण्यासाठी मला पाच वर्ष संघर्ष करावा करावा लागला होता. ज्यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्रीपदाचा अनिल पाटील यांनी पदभार घेतला. यानंतर त्यांना मी सर्व परिस्थिती समजावून सांगितली आणि यानंतर संबंधित शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो. यामुळे 2019 साली शेतकऱ्यांना मदत मिळवून देताना ज्या अडचणी आल्या त्या आता येणार नाही, याची देखील मी काळजी घेणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.