मुंबई : कुठलाही शेतकरी यापासून वंचित राहू नये यासाठी ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी लावण्याचा जो उपक्रम जाहीर केला, तो लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी याठिकाणी केली. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मागणी केली.
ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी होणार आहे, असे कृषीमंत्र्यांनी काल जाहीर केलं. याबाबत विधानपरिषदेत बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी होणं, हे अत्यंत गरजेचं आहे. कारण पीक पाहणी लावल्याशिवाय आपण कुठल्याही पद्धतीचा लाभ त्या शेतकऱ्याला देऊ शकत नाही. मागच्या काळात कांद्याच्या बाबतीत देखील पाहिलं की, अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहिले, कारण त्यांची पीक पाहणी लागली नव्हती.
पीक पाहणी लावण्यासाठी जे अॅप आपण तयार केलं, त्याला त्या शेतात जावं लागतं, तिथून फोटो काढावा लागतो, जीपीएस द्यावा लागतो. पण अनेक ठिकाणी रेंज नाही. नेटवर्क नाही. अशा ठिकाणचे शेतकरी हे पीक पाहणीपासून वंचित राहतात. म्हणून कुठलाही शेतकरी यापासून वंचित राहू नये यासाठी ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी लावण्याचा जो उपक्रम जाहीर केला, तो लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी याठिकाणी केली.
तसेच नाशिक जिल्ह्यातून अनेक कृषी उत्पादनांची निर्यात केली जाते. द्राक्ष, डाळिंब, कांदा, या शेतीमालाची निर्यात याठिकाणी केली जाते. याची निर्यात होत असताना हा माल कुठे जातो, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान यासारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये आपला माल जात नाही. आपला माल हा गल्फ, दुबई, आफ्रिका, मलेशिया याठिकाणी जातो. त्यामुळे प्रगत राष्ट्रांमध्ये आपला माल जाण्यासाठी आपल्या मालाची क्वालिटी सुधारली पाहिजे, असेही ते म्हणाले.