मुंबई, 5 मार्च : गेल्या काही दिवसांत लाडकी बहिण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी लाडकी बहिण योजनेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. यावर मंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रत्युत्तर देत लाडकी बहिण योजनेबाबत सरकारकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाही संदर्भात स्पष्टीकरण दिले.
विधान परिषेदत नेमकं काय घडलं? –
आमदार सतेज पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातल्या अनेक बघिनींच्या पुढे प्रश्न निर्माण झालाय. ज्यावेळी योजना सुरू केली. त्यावेळी 10 जीआर काढले. योजना करताना कुठलाही विचारपुर्वक निर्णय झाला नाही. फक्त राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात आला. लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून लाडकी बहिण योजना काढण्यात आली.
आमदार सतेज पाटलांचा सवाल –
आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेबाबत जे निकष आहेत. ते आधीपासूनचे आहेत. मग आज ज्या महिलांना अपात्र करण्यात येत आहे. त्यांची फसवणूक का करताएत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. तुम्ही जीआर काढलात. एक अशासकीय सदस्य तुम्ही अध्यक्ष केलात. कायद्याने मान्यता देण्यासाठी त्यांना अधिकार देण्यात आले. स्थानिक ग्रामसेवक/अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्याचे सांगण्यात आले. त्यावेळी तुम्ही त्यासंबंधीचे प्रमाणपत्र घेण्यात आले होते का? मग आमचं म्हणणे असे आहे की, त्या महिलांना अपात्र करू नका. मात्र, निवडणुकीच्या काळात तुम्हाला लाडकी बहिण आठवली आणि आता निकाल लागल्यावर सावत्र झाली का असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.
निवडणुकीच्या वेळी लाडकी बहिण दिसली आणि पुढील दोन महिन्याचे अनुदान आधी दिले. खरंतर, राज्यात कुठलेही अशी योजना नाहीये. भाऊबीजेला तुम्ही पुढील दोन महिन्याचे अनुदान दिले. मात्र, ताबडतोब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम सरकारकडून करण्यात आले. 2100 रूपयाची तारीख सभापती महोदय याठिकाणी सांगितली जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने ह्या महिलांना अपात्र करण्यात आले आहे. यामुळे त्यांना देखील तुम्ही पात्र करणार आहात का?, असा थेट सवालच आमदार सतेज पाटील यांनी मंत्री आदिती तटकरे यांना केला.
पुढच्या एका वर्षाचे अनुदान द्या –
निकषात बदल करून तुम्ही भुमिकेत बदल करणार का, असाही प्रश्न सतेज पाटलांनी केला. दरम्यान, जसे गिरीश महाजन म्हटले त्याप्रमाणे पुढील 1 वर्षांचे 1500 किंवा 2100 रूपये अॅडव्हान्स दिले तर तुमचा कोल्हापुरात जाहीर सत्कार करतो, अशी मिश्किल टिप्पणही आमदार पाटील यांनी केली. बहिण तुम्हाला एवढी लाडकी वाटत असेल तर पुढच्या एका वर्षाचे अनुदान तुम्ही त्यांना द्या, असेही ते म्हणाले.
आदिती तटकरे यांचे स्पष्ठीकरण –
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, सभापती महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केल्यापासूनच विरोधकांकडून कुठे ना कुठे जाहीर टीका केली जातेए. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशन काळात अथवा अर्थसंकल्पात 2100 रुपयांची घोषणा करू, असे कुठलेही विधान त्यांनी केलेले नाही. जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो. दरम्यान, ज्यावेळी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री योग्य पद्धतीने निर्देश देतील त्यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही शासनासमोर ठेऊ, असेही मंत्री तटकरे म्हणाल्या.
हेही वाचा : वीर जवान जितेंद्र चौधरी अनंतात विलीन; पारोळ्यात अंतिम निरोपासाठी उसळला जनसागर