जळगाव, 7 ऑगस्ट: राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी आज जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांना भेट देऊन शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, शाळांमध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि शैक्षणिक वातावरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्याबाबत सूचना देत विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला अधिक बळ देण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात उपायुक्त तुषार महाजन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी यावल तालुक्यातील साकळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच शारदा हायस्कूल येथे भेट देऊन वर्गखोल्या, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता, डिजिटल सुविधा आणि शाळेतील एकूण वातावरणाची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अध्ययनातील आवडी-निवडी, शैक्षणिक प्रगती, शालेय उपक्रम तसेच उपलब्ध सुविधांविषयी माहिती घेतली.

त्यानंतर त्यांनी पाळधी येथील जिल्हा परिषद शाळा, कन्या शाळा तसेच ए. टी. झांबरे विद्यालयाला भेट देऊन विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित उपस्थिती, वाचन संस्कृती, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम यांना अधिक चालना देण्याबाबत सूचना केल्या.
शाळांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याला आनंददायी, गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणादायी शिक्षण मिळावे, यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी नियोजन करून विविध शैक्षणिक अभियानांची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासोबत जिल्ह्यातील शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. शाळांमध्ये गुणवत्ता वृद्धीसाठी, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन अभियान राबविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
दौऱ्यादरम्यान शाळांतील शिक्षकांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे प्रधान सचिवांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शिक्षणाची गुणवत्ता सातत्याने उंचावण्यासाठी प्रशासन, शिक्षक आणि पालक यांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.






