मुंबई, 11 सप्टेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १० सप्टेंबर रोजी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, पेपरफुटी, उत्तरपत्रिका, मुलाखती, पोलिस भरती तसेच विविध संस्थांच्या परीक्षांबाबतच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. विद्यार्थ्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी सखोल तपास सुरू असून, हा तपास अंतिम टप्प्यापर्यंत नेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘प्रणाली सुधारण्यात रस आहे, लपवण्यात नाही,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच गट-ब आणि गट-क मुख्य व पूर्व परीक्षा २०२५ चीही चौकशी करण्यात येणार आहे. लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचेही सांगण्यात आले.
व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती –
एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा करण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती राज्यभर दौरा करून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सूचना व तक्रारी समितीसमोर मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय राजूरकर समितीच्या शिफारसींचीही पडताळणी करून योग्य शिफारसींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
माहितीच्या अधिकारांतर्गत उमेदवारांना उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत एमपीएससीला शिफारस करण्यात येणार आहे. ज्या इतर परीक्षांबाबत तक्रारी आहेत, त्यांची फेरतपासणी केली जाणार असून, आवश्यकतेनुसार तोपर्यंत मुलाखती थांबविण्याची भूमिका घेण्यात येणार आहे. गुन्हे शाखेच्या तपासाचा प्राथमिक अहवालही सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिस भरतीसाठी समान गुणपद्धती –
यावेळी पोलिस भरती प्रक्रियेतही बदल करण्याचे संकेत देण्यात आले. उमेदवारांच्या दोन्ही पायांवर चिप लावणे किंवा त्याऐवजी अन्य तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत पर्याय तपासला जाणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुणांचा एकसमान पॅटर्न लागू करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. सारथी, बार्टी आणि महाज्योतीशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचेही निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
पीएमसी, एमएमआरडीए परीक्षांचीही चौकशी –
पीएमसी आणि एमएमआरडीएच्या परीक्षांबाबत आलेल्या तक्रारींचीही सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. एमपीएससी अध्यक्ष किंवा सचिवांविरोधात ठोस पुरावे दिल्यास स्वतंत्र चौकशी करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. दोषी कोणताही असो, त्याला वाचविले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
परीक्षांच्या प्रक्रियेत पारदर्शकता हा मुख्य निकष ठेवण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया होत असल्याने पुढील परीक्षा आवश्यक ती यंत्रणा सज्ज झाल्यानंतरच घेण्यात येतील. त्यामुळे काही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तसेच एमपीएससीमध्ये स्वतंत्र समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करून त्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, या सर्व प्रक्रियेला कालबद्ध स्वरूप देण्यात येणार असून, पुढील आठ दिवसांत संबंधित प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना दिले.






