जळगाव, 13 जुलै: जिल्ह्यातील ग्रामीण भागात नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असणे अत्यावश्यक असून, आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी. तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात सोमवार, दि. १३ जुलै रोजी आरोग्य विभागाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा व कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवांवर नियमित देखरेख ठेवून सेवा अधिक सक्षम करण्यासाठी वैयक्तिक पुढाकार घ्यावा.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया व इतर किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अशा आजारांची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण प्रभावीपणे राबवून वेळेत निदान व उपचार सुनिश्चित करावेत, जेणेकरून साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवणे सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, किशोरींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. लसीकरणाबाबत जनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी अधिक प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले.






