ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरेश्वर (पाचोरा) : शिक्षकांनी व्यासंगी, बहुआयामी व ज्ञाननिष्ठ असावं, दर्जेदार शिक्षण देऊन अध्यापन केल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडतात तेच प्रा. राजेंद्र चिंचोले सरांनी केलं, असे गौरवोद्गार शिक्षण मंडळाचे चेअरमन तथा नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी केले.
काल शनिवारी 22 जून रोजी शनिवारी ग्रामविकास शिक्षण मंडळ पिंपळगाव हरेश्वर यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा भौतिकशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
चिंचोले सरांनी समाजासाठी खूप मोठे कार्य केले –
पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. पुस्तकातून क्रांती आणि शांती जन्माला येते. शिक्षणामुळे जीवनात बदल होतात. व्यथा आणि वेदना आयुष्यातून निर्मूलन करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे चिंचोले सरांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण देत असताना राज्यभर स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन करून समाजासाठी खूप मोठे कार्य केले आहे, या शब्दात डॉ. बी. बी. चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कष्ट आणि सातत्य महत्त्वाचे –
दरम्यान, या कार्यक्रमाला दिपस्तंभ मनोबल फाऊंडेशनचे प्रमुख यजुर्वेंद्र महाजन यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी ते बोलताना म्हणाले की, आयुष्यात कष्ट आणि सातत्य या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फक्त कष्ट असून चालत नाही. त्याला सातत्याची जोड हवी आणि चिंचोले सरांनी या दोन्ही गोष्ट केल्या, त्यामुळे ते इतकं मोठं काम करू शकले. त्यामुळे आज हा इतका मोठा सोहळा होतोय. त्यांनी शिक्षक न होता मास्तर म्हणजे मातृत्वाच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्यांसाठी काम केले. त्यामुळे राजेंद्र चिंचोले हे समाजासाठी दीपस्तंभ आहेत, अशा प्रकारचे गौरवोद्गार त्यांनी चिंचोले सरांसाठी काढले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील ‘या’ मान्यवरांची उपस्थिती
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव शामकांत देवरे, दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक यजुवेंद्र महाजन, पाचोरा भाजपचे अध्यक्ष अमोल शिंदे, पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, व्ही. टी. जोशी, डॉ. बी. एन. पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मधु काटे ,उद्धव मराठे, नितीन तावडे, देविदास महाजन, पी. एस पाटील, ए. एस. जाधव, एस. टी. गीते, ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील, चिटणीस एस. व्ही. गीते, संस्थेचे मुख्याध्यापक पी. एस. महाजन सर, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आजी-माजी संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रा. चिंचोले सरांच्या पत्नी सविता चिंचोले, आई प्रमिला चिंचोले, भावंड, नातेवाईक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. राजेंद्र चिंचोले सरांसारखे व्यक्तिमत्व इतर शिक्षकांनी अंगी कारावे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात दिलीप वाघ यांनी व्यक्त केले. तर यासोबतच डॉ. शामकांत देवरे, वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, संजय वाघ, संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील, शिक्षक अर्जुन सावळे, नितीन तावडे, पी. एल. मेखा, सुमित पाटील, सौरभ चिंचोले, यांनीही याप्रसंगी प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांच्या कार्यपद्धती व जीवनशैली विषयी आपले मनोगत व्यक्त करत प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रामविकास विद्यालयातील 35 वर्ष सेवेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश झोत टाकला.
पिंपळगावाचा माझ्या आयुष्यात मोठं योगदान –
तर सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांनी ग्राम विकास मंडळ आणि पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सद्भावना व्यक्त केली. यापुढेही माझे कार्य करिअर व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विनामूल्य अविरत सुरू राहील, असा ठाम निश्चय व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, मला आयुष्यात इतरही गोष्टी करता आल्या असत्या. मी इथे नसतो तर कदाचित प्रशासनात मोठा अधिकारी असतो किंवा शास्त्रज्ञ झालो असतो, खूप पैसे कमावू शकलो असतो. पण आज मी जे आहे, ते निश्चितच नसतो. मला पिंपळगाव वासियांनी जे प्रेम दिलं, जे काम मी करू शकलो, ते फक्त या गाववासियांमुळे. त्यामुळे मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी संस्थेतर्फे प्रा. राजेंद्र चिंचोले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सपत्नीक ड्रेस, सुवर्ण अंगठी भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित नागरिकांनीही यथोचित सत्कार केला. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांना सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या सन्मान पत्राचे वाचन मनोज सोनवणे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील आणि अभिजीत पाटील यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन मनोज बडगुजर यांनी केले.
हेही वाचा – “लासगाव बरडीवरील सोलर प्रकल्प रद्द करा!,” ग्रामस्थांची तीव्र मागणी, ग्रामपंचायत प्रशासनाला निवदेन