नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा, या मागणीसाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आज 21 ऑगस्ट रोजी शुक्रवारी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. या प्रकरणात एफआयआर दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. सुमारे पाच तासांच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांची मागणी मान्य करत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शांततेने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पेलेट गनचा वापर केला जातो, मात्र त्यांना न्याय मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली. जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही आणि दोषींवर कठोर कारवाईची खात्री मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
जखमी विद्यार्थ्यासोबत राहुल गांधी यांनी तब्बल पाच ते साडेपाच तास आंदोलन केले. अखेर पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने त्यांच्या मागणीला यश आले. या प्रकरणात न्याय मिळवणे हेच आपले ध्येय असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
20 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर पेलेट गनचा वापर –
20 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांवर रॅपिड ॲक्शन फोर्सकडून (RAF) पेलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत साहिल लोचव याच्यासह काही विद्यार्थी जखमी झाले होते. वैद्यकीय अहवालानुसार, साहिलच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे घुसले असून त्याच्या डोळ्यातही तीन छर्रे लागल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जखमी विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले. अखेर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.






