मुंबई, 19 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला तर विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवली. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय असणार? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरेंनी अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंबाबतच्या वादावर वक्तव्य केल्याने ते उध्दव ठाकरेंना टाळी देणार का? असा देखील सवाल आता उपस्थित झालाय.
राज ठाकरे काय म्हणाले? –
राज ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीत शिवसेना आणि तुमची पुन्हा युती होऊ शकते का? असा प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. खरंतर, आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत.
सर्व मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा – राज ठाकरे
म्हणून एकत्र येणं किंवा एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत. दरम्यान, प्रश्न फक्त इच्छेचा आहे, असेही राज म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, एकत्र येणे हे कठीण नसून आपण महाराष्ट्रासाठी लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे आणि ते मी पाहतच आहे. मात्र, माझे तर म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षातील सर्व मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव? –
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर माझा विचार होता की आपण बाळासाहेब सोडून कोणाच्या हाताखाली काम करायचे नाही. पण शिवसेनेत असताना मला उद्धवसोबत काम करायला काही प्रॉब्लेम नव्हता. मात्र, मी त्यांच्याबरोबर काम करावं, अशी समोरच्याची इच्छा आहे का?” असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी विचारला.
दरम्यान, महेश मांजरेकरांनी “महाराष्ट्राची तशी इच्छा आहे” असे म्हटल्याने” आमची युती व्हावी, अशी महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने त्यांना (उद्धव ठाकरेंना) जाऊन सांगावं तसे, असे उत्तर दिले. दरम्यान, राज ठाकरेंच्या या मुलाखतीमुळे उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली का असा सवाल उपस्थित केला जात आहे.