मुंबई – भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल रात्रीच्या सुमारास निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरातील मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनीही आपल्या खास शैलीत डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
एक्सवरील पोस्टमध्ये राज ठाकरेंनी काय म्हटलं?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलं की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. 1991 ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती.
अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं.
जुलै 1991 साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, “no power on earth can stop an idea whose time has come”. थोडक्यात भारताचा काळ सुरू होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग.
पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, “I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament…. ”
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच.
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन…
राज ठाकरे।
Manmohan Singh : अर्थऋषीचे निधन, संपूर्ण भारतात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर